राजर्षी शाहु महाराज



समतेसह स्वाभिमानाचे जगणे दिले,


शिक्षणाचे दार आरक्षणासह खुले केले.


कलावंतांना कौशल्याचे मोल लाभले,


दूरदृष्टीचे सृजनात्मक शाहूराजे भले!


           २६ जून १८७४ रोजी राधाबाई जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी कोल्हापूरात 'यशवंत' जन्मास आले. केवळ तीन वर्षांच्या वयात आईविना पोरके झालेल्या पोरास दहाव्या वर्षी कोल्हापूर संस्थानातील राजा शिवाजी चौथा यांच्या विधवा राणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले. सिंहासनावर आरूढ होत राज्यारोहणावेळी त्यांचे 'छत्रपती शाहू महाराज' असे नामकरण झाले.


         शाहूराजे पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी गेले असताना पुरोहित नारायण भटजींनी वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटल्याचे सहकारी राजारामशास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणून दिले. महाराज क्षत्रिय नसल्यामुळे आपण असे केल्याचे सांगत, क्षत्रियांना केवळ पुराणोक्तच मंत्राचा अधिकार आहे असे सुनावले. जात्यांध समाजव्यवस्थेत दस्तुरखुद्द राजाची ही दयनीय अवस्था तर प्रजेची गत काय? या विचारातून खऱ्या अर्थाने समतेच्या संघर्ष चळवळीचा प्रारंभ झाला. वेदनेच्या कोलाहलातून सर्जनशील कृती अंकुरल्या. आयुष्यातला योग्य वेळेचा डंख नवे पंख देतो, हेच खरं. 


         तळे, विहिरींवर घोडा, गाढव मांजर, डुक्कर, कुत्र्यांनी पाणी पिलेलं मान्य पण ठराविक माणसांनी पाणी पिलेलं वर्ज्य समजलं जाण्याच्या काळात जाती-धर्माची प्रत्येक माणसं एकत्र घेऊन शिक्षणाने माणूस बनण्याचा अधिकार शाहूंनी बहाल केला. अस्पृश्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ५०% आरक्षण देत शाहूराजे 'आरक्षणाचे जनक' ठरले. अर्धपोटी, उपेक्षित जगाच्या दारात या आरक्षणामुळे स्वप्नांचा खजिना घेऊन उदयाचा सोनेरी रथ उभा करणारे शाहू महाराज ज्यांनी स्पर्श करताच तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या अहिल्यारूपी शीळेचा उद्धार झाला. युगायुगांची कुरूपता नष्ट झाली. दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहत विहिरी, तलाव, शाळा, रुग्णालये अशा सार्वजनिक आस्थापनांचा समान वापर करण्याचे आदेश त्यांनी जनतेला दिले. आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा घाट घातला. दत्तक मिळालेलं राजेपण आपल्या स्‍वकर्तृत्‍वातून सिद्ध केलं. अस्पृश्यांना सरकारी नोकरी, तलाठीसारख्या प्रतिष्ठित जागा, माहूत, पोलीस, स्वतःचे मोटार चालक म्हणून नेमले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणत रयतेने राजास मस्तकी धारण केले. जुनाट बुरसटलेल्या जातीपरंपरेने प्रत्येकाच्या डोक्यात घर केलेलं असताना कुठलातरी संस्थानिक अस्पृश्य जनतेला सरकारी नोकऱ्यांमध्ये रुजू करून घेतो. दीनपणाने 'जोहार मायबाप' असं म्हणत कालपर्यंत जे मागून भिकेतलं अन्न खात होते, ते महार व इतर अस्पृश्य रयतेकडून 'रामराम' स्वीकारू लागले. हे चित्र म्हणजे केवळ सामाजिक बदल नव्हता, ती एक सामाजिक क्रांती होती, जी शाहूराजांनी सत्यात उतरवली. १९२० साली शाहू महाराजांनी शहरातील पोलीस गेटवर सोळा महारांची नेमणूक करत कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या चेअरमनपदावर प्रथमच एका अस्पृश्याची दत्तोबा पवार यांची महाराजांच्या प्रेरणेने नेमणूक झाली. अशी अनेक उदाहरणं देता येतील.

प्रजेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विणकाम व सूतगिरणी राजांनी सुरू केली. शिक्षणावर भर हा त्यांचा मुख्य उद्देश होता. ते स्वतः इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र यांचे गाढे अभ्यासक होते. विशिष्ट जातीचीच मुले शिकत आहेत हे लक्षात आल्यावर लिंगायत, नाभिक, शिंपी, ढोर, चांभार, मुस्लिम, जैन आणि ख्रिश्चन अशा जातीव्यवस्थेच्या जात्यात भरडल्या गेलेल्यांसाठी स्वतंत्र जातीवार वसतिगृहे, बोर्डिंग स्कूलची स्थापना,  मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, सर्वांसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण या दुर्लक्षित महाप्रकल्पाचा शिक्षणतज्ञांनी अभ्यास करून राजांचं कर्तृत्व समाजासमोर आणण्याची आज नितांत गरज आहे. स्त्री साक्षरता, देवदासी प्रथेवर बंदी, विधवा पुनर्विवाह मान्यता आणि बालविवाह रोखणे यांसाठी राजांनी प्रयत्न केले. ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा शाहूंवर प्रभाव होता, त्यामुळे फुलेंच्या सत्यशोधक समाजाला त्यांनी संरक्षण दिले.


        मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या संगतीतच राहील, असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते. आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण चांगल्या विचारी माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं. आणि ज्यांचे आदर्श ज्योतिबा असतील त्यांचे कर्तृत्व अन् हेतू समाजहीतच असणार, यात शंका ती कसली?


        कृषी आधुनिकीकरणासाठी किंग एडवर्ड कृषी संस्था स्थापन केली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडीचे प्रयोग केले. कोल्हापूर ही 'गुळाची बाजारपेठ' देशभरात नावारुपास आली. दरबारातील तोफा वितळवून नांगरांचे फाळ बनवत हिंसेपासून सृजनाचा जन्म हा काव्यात्मक संदेश आपल्या कृतीतून दिला. 'राधानगरी' हे धरण छत्रपती शाहूंच्या प्रजेविषयी कल्याणाच्या दूरदृष्टीची साक्ष देते आणि कोल्हापूरला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवते. आपलं अंगण झाडताना शेजारच्या अंगणात चुकून खराटा गेला आणि तिथली वीतभर जमीन झाडली गेली तरी अस्वस्थ होऊन दिवसभर तळमळणार्‍या मनांना शाहू महाराजांचं दातृत्व जाणवायला हवं. ज्या वैभवाला दातृत्वाचे अधिष्ठान तेच खरं ऐश्वर्य. अशा ऐश्वर्यसंपन्न राजाला कित्येक मुजरे करावेत.


         कलासंस्कृतीच्या महान संरक्षक राजांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले. बालगंधर्व, संगीत सूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शाहुंनी महाराष्ट्राला दिले. शाहू महाराजांच्या आश्रयात बंधनाशिवाय व्यक्त होताना हे कलाकार त्या कलेवर हक्काने आपला ठसा उमटवत होते. पारंपारिक कला, शास्त्रीय संगीत, नाट्य, नृत्य यांसारख्या मातृभाषिक ललित कलांना सुट्टीवर पाठवून परभाषेची लाचारी त्यांनी कधीच पत्करली नाही. आपल्या नावापुढे पदव्यांची रिघ लागावी म्हणून शिक्षण न घेता समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीची ती वाटचाल ठरावी, अशा मतांचे शाहूराजे. आज कलावंत कलावंतांसाठी सुपार्‍या देतात. आपल्या हातून आविष्कार होण्याऐवजी दुसऱ्यांच्या हातून तो होऊ नये यासाठी षड्यंत्र रचतात. एक ना दोन दरिद्री माणसांच्या तऱ्हा तरी किती वर्णाव्यात?


        कुस्ती हा प्रिय खेळ शाहूंनी आपल्या कारकीर्दीत जिवापाड जपला, वृद्धिंगत केला. ते स्वतः मल्ल होते. खासबाग मैदानात नव्वद हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करत कुस्तीची, मल्लविद्येची पंढरी म्हणून कोल्हापुराची ओळख निर्माण केली. धनगर समाजातील देवप्पा धनगर मल्ल जबरी बलदंड. तो रुस्तुम-ए-हिंद होईल अशी खात्री राजांना होती. दुर्दैवाने कॉलऱ्यामुळे तो मृत्युशय्येवर असताना,"डॉक्टर याला वाचवाल तर त्याच्या भारंभार सोने तुम्हाला देईल!" असे डॉक्टरांना सांगणारा राजा, देवप्पाच्या मरणावर धाय मोकलून रडला. राजाचं मन किती खोल? बलदंड शक्तीचा असा भावनिक राजा पुन्हा होणे नाही. शाहीर हैदर यांच्या साताच्या पाढ्याच्या लावणीचं कौतुक करत शाहिराला हत्तीवरून फिरवत साखर वाटणारा, गुणग्राहक राजा. राजदरबारी राजाश्रय दिलेल्या आबालाल रहमान या चित्रकाराने शाहूराजांच्या निधनानंतर सर्व चित्रे पंचगंगेत जल समर्पित केली, अगदी तुकोबांच्या गाथेप्रमाणे. कारण काय तर चित्रांची पारखी, रसिक नजर गेली, चित्रांची किंमत शून्य झाली. भाऊ फक्कड या मातंग शाहिराला पहाडी आवाजाचं कौतुक करत सोन्याचं कडं बक्षीस दिलं. समाजाबद्दलच्या आपुलकीने धुंद होणाऱ्या शाहूंच्या कर्तृत्वाची गाथा वाचत तल्लीन होऊन ब्रम्हानंदी टाळी लागावी, असा हा प्रवास.


       फक्त वेदोक्त प्रकरण व आरक्षणापुरते संकुचित न ठेवता कर्तृत्वाने पराक्रम गाजवणारे, शिवरायांच्या रयतेच्या राज्याची कल्पना खऱ्या अर्थाने सत्यात उतरवणारे, कला, शिक्षण, शेतकरी यांचा विकास करणारे, नाट्य चळवळीचा पाया रचत मराठी नाटकांचं भरघोस पीक घेणारे, शिवसंभव नाट्य सुरू असताना बाल शिवाजीच्या जन्मप्रसंगावेळी पाळण्यातल्या शिवबाला उचलून, देहभान हरपून संपूर्ण नाट्यगृहात मुजरा करणारे छत्रपती शाहू महाराज समाजासमोर आणण्याची गरज आहे. अंजनीबाई मालपेकर यांनी आपल्या स्त्रित्वावर आलेला बाका प्रसंग बुद्धिमत्ता वापरत सही सलामत सुटका करून घेतली. त्यांना नारळाच्या करवंटीवर बनवलेला एकतारा आणि दोन वाघांची पिल्लं शाहूंनी भेट दिली. वाघिणीसारख्या प्रसंगाला भिडलेल्या कलावंताला दिलेली ही अनोखी भेट जगाच्या इतिहासात अजरामर ठरणारच की.


        मानकऱ्यांना शेजारचं उठवून लाल्या आणि अरव्या या दोन पारध्यांच्या पोरांसोबत जेवणारे, जीवन व्यवहारातून जाती अंताची लढाई लढणारे राजे. आज समानतेची पुरोगामित्वाची मोठमोठी भाषणं देणारी कित्येक मंडळी पारध्यांच्या पालावर जाऊन ताटाला ताट लावून जेवतात? यावर संशोधन व्हायला हवं. आकाशातील ग्रह, तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर मेंदू आणि मनगटाचा उपयोग काय? असा सवाल करत अंधाधुंदीचं, ज्ञानबंदीचं कंबरडं शाहूराजांनी मोडलं. समतेचा, समानतेचा मुक्त उद्घोष करणारे, शुद्ध अभिजात चारित्र्याचे, ललित कलांचे साधक, शिक्षणाविषयीचा अर्थ गर्भित आशय पटवून देणारे, जिवंतपणाचा स्पर्श लाभलेले राजे खऱ्या अर्थाने 'राजर्षी' ठरले. त्यांच्या तपश्चर्येवरून लेखकाने कित्येक लेख ओवाळून टाकावेत असं त्यांचं चरित्र. भारताच्या नियतीवर रेखाटलेल्या जळजळीत लालभडक जातिभेदाच्या प्रश्नचिन्हाचं उत्तर म्हणजे शाहू महाराज.

तिन्हीसांजेला दिवा लागला की प्रतिक्षिप्त क्रियेसारखे हात जोडले जातात, अगदी तसंच, त्याच सहजतेने यांचं कर्तृत्व पाहताना नतमस्तक व्हावेसे वाटते. श्रमिक, जातीवादात होरपळलेल्या, दिशा हरवलेल्या वाटसरुंना शिक्षणाच्या पाऊलखुणा राजांनी दाखवल्या. सगळ्यांनाच आभाळव्यापी कामं नाही करता येत. कदाचित कणभरच काम असेल एखाद्याचं पण, त्या कणातही क्षमता असतेच की विश्व धारण करण्याची.


         भीमरावांची प्रखर बुद्धिमत्ता आणि अस्पृश्यता निवारणाच्या त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रभावित होत अस्पृश्यांच्या सुधारणेसाठीच्या परिषदेत राजांनी त्यांना अध्यक्ष केले. शाहूंनी दिलेल्या २५०० रुपयांतून बाबासाहेबांनी स्वतःचे 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले. जिद्दीची घोरपड बिकट परिस्थितीतच नखं रोवते तसे, बाबासाहेब. 'सामाजिक लोकशाहीचे स्तंभ' असा शाहूंचा गौरव आंबेडकरांनी केला. ज्याने जगाला माणसातल्या माणुसकीची व्याख्या शिकवली त्यांच्या कर्तृत्वाची उंची कशी मोजता येईल? आपल्याला एखादा महावृक्ष किंवा कल्पतरू होता नाही आलं आणि क्षणभर एखादा वाटसरु आपल्या सावलीत विसावला तरी पुरेसे.


       काहींना समाजसुधारक आठवतात पण फक्त कॅलेंडरच्या वाटेत आलेल्या तारखांमुळे. दिनांक बदलला की यांचे त्या समाज सुधारकांबद्दलचे प्रेम तत्क्षणी ओसरते. मात्र काही जण स्वतःच आनंदोत्सव असतात, कृतीतून विचार पेरत जातात. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या मनाच्या कोपऱ्यात एकतरी सूर्य आपला असायला हवा, जो अखंड प्रकाशाचा वर्षाव करत राहील. चुकल्या क्षणी आपले कान पकडून दिशा दर्शवेल. राबणाऱ्या हातांचा, मायमाऊलींचा, आदिवासींचा राजा, जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारा, माणसा- माणसातला भेदभाव दूर करणारा, भटशाहीच्या मक्तेदारीला अन् मनुवादाची लक्तरे वेशीला टांगणारा, शाहूंशिवाय दुजा राजा कोणता?


       माझी प्रजा सदैव तृप्त असावी हा ध्यास आजन्म उराशी बाळगणारा दत्तकपुत्र अवघ्या राष्ट्रातील कलाकारांना दत्तक घेतो, जातीची बंधने झुगारत अस्पृश्यांना शिक्षणाचं अभय देतो, रयतेचा तारणहार होतो, हेच खरं तर किती अद्वितीय आहे. आपणही असंच भर उमेदीच्या काळात समाजोपयोगी काहीतरी पेरून ठेवावं की आयुष्याची समाधानाने सांगता व्हावी. शाहू-फुले-आंबेडकर वाचणारा वाचक कधीच दंगली घडवणार नाही, सहृदयतेच्या जाणीवेचा परिपोष होईल, समाजसुधारकांच्या विचारांसोबत भटकताना. शाहूंच्या कार्याची पारायणं करावीत तरी किती? प्रत्येक घटनेगणिक वेगवेगळा आशय गर्भित होतो. योग्य विचारांची ठिणगी योग्य वेळी मनात पडणे अन त्याचा ज्वालामुखी होणे यातून स्वप्न सत्यात साकारलं जातं. शाहू महाराजांची बलदंड शक्तीची कर्तृत्व गाथा प्रेरणेचा अखंड झरा समर्पित करते. 


        आजच्या युगात संघर्षाचं गीत गाणारा राजेंद्र भारूड, भिल्ल समाजातील पहिला आय.ए.एस. अधिकारी होतोय आणि समाज बदलाचा महायज्ञ ठरतोय. मनानं खचलेल्या, शारीरिक अपंगत्व असलेल्या २७० मुलांना सांभाळून त्यांना उत्तम शिक्षणाचं दान देत 'मनोबल' वाढवणारा, समाजासाठी युजवेंद्र महाजन 'दीपस्तंभ' ठरतोय. बीडमधील दीपक नागरगोजे ऊसतोडणी कामगारांच्या गोड साखरेची कडू कहाणी सांगत तमासगीर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं प्रज्वलित करतोय. काश्मीरमध्ये  बोर्डरलेस कार्य सत्यात उतरवत ‘बसेरा ए तबस्सुम’ मध्ये कित्येक  आतंकवाद्यांच्या अनाथ पोरांवर मानवतेचे संस्कार करत अधिक कदम त्यांचा पालनकर्ता होतोय. अवघ्या महाराष्ट्रातल्या अनाथांची माय ठरलेली सिंधुताई सपकाळ, 'गतीचे गीत गात दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही', असं म्हणत अख्खा आयुष्याची 'समिधा' अन् निढळाची कमाई कुष्ठरोग्यांसाठी वाहणारे, एखाद्या स्वयंस्फूर्त ज्वालेचे दुर्लभ दर्शन असणारे बाबा आमटे. अशी कितीतरी नावं आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचे नवे मापदंड प्रस्थापित करत शाहू महाराजांचा वसा आणि वारसा आपल्या बळकट खांद्यावर लीलया पेलला आहे. क्षितिजाला भिडू पाहणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख न पाहताच मरणारे कित्येक असतील पण ती यादी एका संख्येने वाढवून आपण त्या यादीचे भागीदार होऊ नये, असे मनाशी ठाम ठरवायला हवे.

दररोजची ठरलेली कामं आहेतच प्रत्येकाला, त्या प्रत्येक ठरलेल्या कामाचं चित्र पुन्हा त्याच त्या रेघांनी आपण अधिक गडद करतो. कधीच वाट बदलून पुस्तकांच्या दुनियेत जात नाही. केलेल्या कामाचं सिंहावलोकन करत नाही. निदान त्यांचं कार्य कर्तृत्व पाहून तरी समाजाविषयीच्या आपल्या कोरड्या जाणिवेला सह्रदयतेची पालवी येत राहावी आणि आपल्याही कर्तृत्वाचा बहर रुजत रहावा, हीच सदिच्छा! आपल्या प्रत्येकाच्या स्वार्थी अंधारात प्रकाशाचा, संवेदनेचा हा उजेड असेल तर दिवाळी असो किंवा नसो दैनिक दीपोत्सव होणारच. समतेचा विचार वाचताना, उघड्या डोळ्यांनी त्यांच्या कार्याचं विराटत्व अनुभवून, दिव्यतेने लीन झालेलं मन नेहमीच शाहु महाराज यांच्या चरणी वंदन करीत राहिल, याची काळजातून ग्वाही देत थांबतो!

No comments:

Post a Comment